८४ लक्ष योनी, ४ लक्ष मनुष्यजन्माचा प्रवास

परमात्मा मायेकरवी जन्म-मृत्यूचे चक्र फिरवतो
-------------------
गीतेमध्ये मी वाचलं की, ‘मी (भगवान कृष्ण) हे यंत्र चालवतो. मीच विश्वरेता आहे. मीच विश्वयोनी आहे. करणं-कारणं-कर्ता मीच आहे’. हे भगवंताचं वर्णन व्यासांनी केलंय.

श्रीभीष्मराज मृत्यूपूर्वी धर्मराजाला कलियुगात कृष्णभक्ती कशी महत्त्वाची आहे हे श्रीविष्णूसहस्रनामाकरवी सांगतात.

‘माझ्या अस्तित्त्वाविषयी, माझ्या सत्तेविषयी जाणणारा फ़ारच विरळा असतो. माझ्या पदी येणारा व जन्म - मृत्यू चक्रातून सुटणारा फ़ारच विरळा असतो’, असं परमात्मा अर्जुनला सांगतो. ‘कारण सर्व जीव माझ्याच प्रभावी अनादी अनंत मायेच्या आवरणाने अंध झालेले असतात.

त्रिगुणमयी माया जीवात्म्याला कर्मबंधनांत टाकते. चांगलं काम केलं की पुण्य हे फ़ल आणि चुकीचं काम केलं की पाप हे फ़ल, या फ़लांप्रमाणे जीवाची मृत्यूपश्चात गती - हे रहाटगाडगं परमात्म्याच्या सृजन शक्तीनं निर्माण केलं आहे, ते त्याला रिझवण्यासाठी. आपलंच प्रतिबिंब अनंत रूपांमध्ये तो बघतो आणि स्वत:चे करमणूक करून घेतो. सर्व विश्वव्यापारांत भाग घेऊनही निर्लेप असतो.

परमात्म्याच्या या रहस्याचे महत्त्व ऐकणं, समजणं, उमजणं आणि त्यानुसार वर्तमान जगण्याचा अर्थ लावता येणं हे केवळ गुरुकृपेनेच शक्य होतं.

म्हणूनच या चित्रात एक निळा मार्ग आहे. त्यावर लाल अंडाकृती जीवात्मा विविध योनींमधून प्रवास करतोय. दोन जन्मांमध्ये कर्मानुसार स्वर्ग-पाताळ-नरक यातील अनुभव घेतो आहे.

कधीतरी या जन्म-मृत्यू चक्राचं रहस्य कळावं आणि हे चक्र फ़िरवणार्‍या अनंत शक्तीशी परिचय व्हावा. ही ज्याची शक्ती त्या परमात्म्याविषयी उत्सुकता वाटावी. त्याच्या समीप जाण्याची इच्छा व्हावी.

हे सर्व करण्यासाठी सद्‌गुरुंनी स्वीकारावं, त्यांची कृपा व्हावी. त्यानं जीव न्हाऊन जावा. जीवाला परमात्म्याच्या चरणाशी जाऊन तिथंच विलीन होण्याची व या दुष्टचक्रातून कायमचं सुटण्याची संधी लवकरात लवकर मिळावी, ही इच्छा, या चित्रातून मी व्यक्त केली आहे.

‘अज्ञानाचा अंध:कार म्हणजे मीच कर्ता, देह म्हणजेच मी, मीच सत्तावान’, हा विचार कमी होत जाऊन, ‘परमात्मा हेच सत्य, तेव्हढेच फ़क्त अस्तित्त्व, बाकी सर्व त्याच्या मायेने निर्माण केलेला भास, तोच फ़क्त असतो, बाकी काहीच नसते.’ या ज्ञानाची पहाट व्हावी, त्या उजेडात मी त्याच्यात विलीन होऊन हे द्वंद्व (दुजेपण) कायमचे संपावे.

॥श्रीराम समर्थ॥